पावसाने दोन-तीन दिवसात उसंत घेऊन आज जोरदार सुरुवात केली. शहरासह धरण क्षेत्रात दिवसभर दमदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली, तर धरणक्षेत्र व नदीक्षेत्रात पडलेल्या पावसाने पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फूट एक इंचाने वाढली.
१७ बंधारे पाण्याखाली आहेत. नऊ मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहिली. दरम्यान, उद्या मंगळवारपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात यलो अलर्टचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तविला आहे.
कालपासून पावसाचे आर्द्रा नक्षत्र लागले असून, त्याचे वाहन उंदीर आहे; परंतु पहिल्या दिवशी पावसाची उघडीप राहिली; मात्र दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीपासून पावसाने शहरासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू राहिला. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. जिल्ह्यात १३.९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात एक फूट एक इंचाने वाढ झाली. रविवारी सकाळी आठ वाजता २४ फूट आठ इंच असणारी पाणी पातळी रात्री आठ वाजता २५ फूट ११ इंचांवर पोहोचली.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, कुंभी नदीवरील सांगशी, कासारी नदीवरील ठाणे-आळवे, बरकी, यवलूज, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, सरकारी कोगे, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव हे बंधारे पाण्याखाली गेले.
जिल्ह्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावरील एक राज्यमार्ग, शिरोळ तालुक्यातील शिरोळ बंधारा व अनवढी ओढ्यावरील दोन प्रमुख जिल्हामार्ग, एकसंबा-दत्तवाड, शिरढोण-तेरवड, दत्तवाड ते मालिकवाड, कनवाड ते म्हैशाळ हे चार ग्रामीण मार्ग व कंदलगाव ते मानबेट व आरळे ते घानवडे हे मार्ग एस. टी. महामंडळाकडून बंद केले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातील २२ कच्च्या घरांची पडझड होऊन सुमारे सव्वा सहा लाखांचे नुकसान झाले.
गगनबावड्यात सर्वाधिक ४४.२ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात १३.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ४४.२, पन्हाळा-२३.२, शाहूवाडी-२२.३, आजरा-१६.२, शिरोळ-४.८, राधानगरी-१८.३, करवीर-१३.४, कागल-९.२, गडहिंग्लज-६.८, भुदरगड-१४, चंदगड-११.७ मि.मी. असा पाऊस पडला.
पाटगाव धरण क्षेत्रात सर्वाधिक ११० मि.मी.पाऊस
पाटगाव धरण क्षेत्रात सर्वाधिक ११० मि.मी. पाऊस पडला. त्या खालोखाल सर्फनाला-१०५, दूधगंगा-७५, राधानगरी-५४, तुळशी-५४, वारणा-२९, कासारी-२१, कडवी-४४, कुंभी-२३, चित्री-६०, घटप्रभा-४५, आंबेओहोळ-१० मि.मी. इतका पाऊस कोसळला.
धरणातील पाण्याचा विसर्ग (सोमवारचे चित्र)
राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक, तुळशी धरणातून ३०० क्युसेक, वारणा धरणातून १७२० क्युसेक, दूधगंगेतून १६०० क्युसेक, कासारी धरणातून २५० क्युसेक, कडवी धरणातून २२० क्युसेक, कुंभी धरणातून ३०० क्युसेक, घटप्रभा धरणातून ३१७४ क्युसेक, सर्फनाला धरणातून १५३ क्युसेक, धामणी धरणातून ९६९ क्युसेक विसर्ग सुरू राहिला.