पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी असलेल्या खराब हवामानामुळे त्यांना मिझोरमची राजधानी आयजोल येथील विमानतळावरूनच सुमारे ९००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्धाटन करावे लागले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आयझॉलमधून तीन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधानांनी बैराबी-सायरंग रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. या रेल्वे मार्गामुळे मिझोरम पहिल्यांदाच देशातील इतर राज्यांशी थेट रेल्वे नेटवर्कने जोडण्यात आले आहे. यामुळे आता मिझोरममधून दिल्लीसाठी थेट रेल्वेसेवा सुरू झाली आहे. या नव्या रेल्वे लाईनमुळे या भागातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यावेळी एका जाहीर सभेलाही संबोधित केले. मी या सुंदर निळ्या पर्वतांच्या भूमीवर असलेल्या पथियन देवतेला नमन करतो. दुर्दैवाने खराब हवामानामुळे मी आयझॉलमधून तुमच्याशी जोडलो आहे. पण तरीही इथूनच मला तुमच्या प्रेमाची जाणीव होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
केवळ रेल्वे लाईन नव्हे तर विकासाची जीवनरेषा
आज मिझोराम भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा दिवस मिझोरामच्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे. आजपासून, आयझॉल भारताच्या रेल्वे नकाशावर आले आहे. काही वर्षांपूर्वी मी या रेल्वे लाईनची पायाभरणी केली होती आणि आज संपूर्ण देशासाठी ही रेल्वे सुरु होत आहे. अनेक अडचणींवर मात करून, बैरबी-सैरंग रेल्वे लाईन प्रत्यक्षात आली आहे. हे काम आपल्या अभियंत्यांच्या कौशल्यामुळे आणि कामगारांमुळे शक्य झाले. या रेल्वेमुळे पहिल्यांदाच मिझोराममधील सैरंग शहर राजधानी एक्सप्रेसमुळे थेट दिल्लीशी जोडले जाईल. ही केवळ रेल्वे लाइन नाही, तर ती विकासाची जीवनरेषा आहे. यामुळे मिझोरामच्या लोकांचे जीवनमान सुधारेल. शेतकरी आणि व्यावसायिकांना देशभरातील बाजारात आपली उत्पादने विकता येतील. तसेच, शिक्षण आणि आरोग्याच्या चांगल्या संधीही मिळतील. या विकासामुळे अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरु होणार
गेल्या अकरा वर्षांपासून त्यांची सरकार ईशान्य भारताच्या विकासासाठी काम करत आहे. आता हा प्रदेश भारताच्या विकासाचे इंजिन बनत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ईशान्येकडील राज्यांना रेल्वेने जोडले गेले आहे. पहिल्यांदाच, ग्रामीण रस्ते, महामार्ग, मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वीज, नळाचे पाणी आणि गॅस कनेक्शनचा विस्तार करण्यात आला आहे. भारत सरकारने सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता लवकरच मिझोराममध्ये हवाई प्रवासासाठीच्या योजनाही तयार केल्या जातील. या ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा सुरू होतील. ज्यामुळे मिझोरामच्या दुर्गम भागांमध्ये पोहोचणे सोपे होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले