जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि तुम्हाला आजकाल सर्दी, खोकला, घसा खवखवणे, नाकातून पाणी येणे इत्यादी समस्या येत असतील तर अजिबात हलक्यात घेऊ नका. बहुतेक लोकांना असे वाटते की हवामानातील बदलामुळे अशा समस्या येत आहेत परंतु हे H3N2 विषाणूचे लक्षण असू शकतात.
सध्या दिल्लीत H3N2 फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि हा वेगाने पसरत आहे.
हा इन्फ्लूएंझा A विषाणूचा एक प्रकार आहे. रुग्णालयांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि त्याची लक्षणे ओळखण्याचा इशारा दिला आहे, जेणेकरून वेळेत उपचार सुरू करता येतील. लोकलसर्कलने एक सर्वेक्षण केले आहे ज्यामध्ये ११००० हून अधिक लोकांनी भाग घेतला. असे सांगितले जात आहे की दिल्ली-एनसीआरमधील ६९% घरांमध्ये सध्या एक किंवा दुसरा सदस्य कोविड, फ्लू व्हायरल फिव्हर सारख्या लक्षणांनी ग्रस्त आहे.
नक्की काय आहे हा विषाणू?
H3N2 हा इन्फ्लूएंझा A विषाणूचा एक प्रकार आहे जो दरवर्षी हंगामी फ्लू साठी कारणीभूत ठरतो. सुरुवातीला तो सौम्य वाटतो, परंतु तो लवकर बदलतो, ज्यामुळे त्याचे नियंत्रण करणे अधिक कठीण होते. हा अजिबात हलक्यात घेणारा विषाणू नाही. दिल्लीत सध्या हा आजार अधिक प्रमाणात पसरला असून अभ्यासानुसार ७० टक्के लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
कसा पसरतोय व्हायरस?
H3N2 हा इन्फ्लूएंझा A ने संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये खूप सहजपणे पसरतो. संक्रमित व्यक्तीजवळ राहणे किंवा संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श करणे देखील संसर्गास कारणीभूत ठरू शकते. तसंच सदर व्यक्तीला याबाबत अजिबात कल्पना नसते आणि त्यामुळेच हा व्हायरस वेगाने पसरतोय.
काय आहेत h2n2 ची लक्षणे?
जर तुम्हाला H3N2 फ्लू असेल तर तुम्हाला सामान्य सर्दीसारखी लक्षणे दिसू शकतात जसे की अचानक सुरू होणारा उच्च ताप, सतत खोकला, घसा खवखवणे, शरीर आणि स्नायू दुखणे, अशक्तपणा आणि थकवा, डोकेदुखी, वाहणारे किंवा बंद झालेले नाक आणि कधीकधी उलट्या किंवा मळमळ.
ही लक्षणे सहसा विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर १ ते ४ दिवसांनी सुरू होतात. बहुतेक लोक गुंतागुंतीशिवाय बरे होतात, परंतु या आजारामुळे वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांमध्ये न्यूमोनियासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात.
कसा बरा होतो आजार?
बहुतेक निरोगी लोक विश्रांती घेतल्याने १ ते २ आठवड्यांत बरे होतात. बरेच लोक ताप किंवा शरीरदुखी कमी करण्यासाठी सामान्य औषधे देखील घेतात. परंतु जर लक्षणे वाढू लागली किंवा कमी होत नसतील तर ताबडतोब डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे.
गरज पडल्यास डॉक्टर अँटी-व्हायरल औषधे लिहून देऊ शकतात. संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर ४८ तासांच्या आत घेतल्यास ही औषधे सर्वात प्रभावी ठरतात. यामुळे आजाराची तीव्रता आणि कालावधी दोन्ही कमी होतो.
कशी घ्यावी काळजी?
H3N2 टाळण्यासाठी, दरवर्षी फ्लू ची लस घेणे, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, आजारी लोकांपासून अंतर राखणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड रुमाल, टिश्यू पेपर किंवा कोपराने झाकणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, दररोज स्पर्श केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करणे इत्यादी नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे