महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाली असून ती 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
31 जानेवारीपर्यंत बारावीच्या परीक्षेसाठी 1 लाख 16 हजार 612 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळाकडून बारावी, दहावी परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. लेखी परीक्षेचे साहित्य परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आले आहे. केंद्र संचालकांच्या नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे. दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होईल. कोल्हापूर विभागातून सुमारे 1 लाख 32 हजार 975 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर सात भरारी पथके असणार आहेत. दि. 2 फेब्रुवारी रोजी भरारी पथक व परीरक्षकांची सभा विभागीय मंडळात होणार आहे.
शाळा व परिसरासह परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत केंद्र असलेल्या सर्व शाळा प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय मंडळ स्तरावर उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित केली आहेत. कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी विभागीय मंडळ व जिल्हा प्रशासनाकडून तेथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती काम करणार आहे.
गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रावर तत्काळ कारवाई
विभागीय मंडळांतर्गत संवेदनशील परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीचे ऑनलाईन फुटेज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीकडे देण्यात येणार आहे.परीक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यमंडळ व विभागीय मंडळ कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून येतील तेथे तात्काळ निर्णय घेऊन कारवाई केली जाणार आहे.





