Saturday, February 28, 2026
Homeमहाराष्ट्रतुमच्या आवडत्या Haldiram प्रोडक्ट्समध्ये भेसळ, अन्न सुरक्षा विभागाने पकडला 112 किलो Expired,...

तुमच्या आवडत्या Haldiram प्रोडक्ट्समध्ये भेसळ, अन्न सुरक्षा विभागाने पकडला 112 किलो Expired, तर 55 लाखांचा भेसळयुक्त साठा

सण जवळ आला की आपल्या घराघरात आनंदाचं वातावरण असतं. पाहुणे येणार म्हणून घराची साफसफाई होते, नवीन कपड्यांची खरेदी होते आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘मिठाई’.आपल्याकडे पद्धतच आहे, कोणतंही शुभ कार्य असो किंवा सण, तोंड गोड केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. पण ही मिठाई खरेदी करताना आपण काय करतो? कोणाचं तरी पोट बिघडायला नको किंवा घरातील लहान मुलांना त्रास व्हायला नको म्हणून आपण गल्लीतल्या साध्या दुकानापेक्षा एखाद्या मोठ्या, नामांकित ब्रँडच्या शोरूममध्ये जातो.

 

“दोन रुपये जास्त गेले तरी चालतील, पण क्वालिटी चांगली मिळेल,” या एका विश्वासावर आपण ‘हल्दीराम’ (Haldiram) किंवा इतर मोठ्या कंपन्यांची पाकिटं डोळे झाकून उचलतो. पण हाच तुमचा विश्वास आता धुळीला मिळण्याची शक्यता आहे. कारण जे सत्य समोर आलं आहे, ते वाचून तुम्ही पुढच्या वेळी मिठाईचं पाकीट उचलताना शंभर वेळा विचार कराल.

 

लखनौमध्ये होळीच्या तोंडावर ‘अन्न सुरक्षा विभागाने’ (FSDA) एक विशेष मोहीम राबवली. सणासुदीत भेसळ रोखण्यासाठी अधिकारी फिरत असताना त्यांना एका मोठ्या गोदामाची माहिती मिळाली. जेव्हा अधिकारी फैजुल्लागंज येथील ‘हल्दीराम’च्या वेअरहाऊसवर (गोदामावर) पोहोचले, तेव्हा तिथे जे पाहायला मिळालं ते भयानक होतं.

 

ज्या ब्रँडवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्याच कंपनीच्या गोदामात तब्बल 112 किलो ‘एक्सपायर्ड’ (मुदत संपलेली) मिठाई सापडली. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. ज्या सोनपापडी आणि राजभोगला आपण आवडीने खातो, ती तिथे मुदत संपूनही तशीच पडून होती. अधिकाऱ्यांनी वेळ न घालवता ही सर्व मिठाई जप्त केली आणि जागीच नष्ट केली.

 

फक्त मिठाईच नाही, तर 55 लाखांचा ‘भेसळयुक्त’ साठा

ही कारवाई फक्त एका गोदामापुरती मर्यादित नव्हती. लखनौच्या विविध भागात जेव्हा धाडी टाकल्या गेल्या, तेव्हा प्रशासनाचेही डोळे चक्रावले.

10 हजार किलो भेसळ: पूर्ण मोहिमेत जवळपास 10,415 किलो भेसळयुक्त मसाले आणि ‘खोया’ (मावा) जप्त करण्यात आला.

या जप्त केलेल्या मालाची किंमत तब्बल 55.91 लाख रुपये इतकी आहे.

ऐशबाग येथील एका कोल्ड स्टोरेजमध्ये 8 हजार किलोपेक्षा जास्त काळी मिरी आणि मावा संशयास्पद स्थितीत आढळला.

 

आपण सणावाराला जे मसाले वापरतो किंवा ज्या माव्यापासून गुलाबजाम आणि गुजिया बनवतो, त्यात ही एवढी मोठी भेसळ असेल, तर विचार करा आपल्या आरोग्याचं काय होत असेल?

 

होळी किंवा दिवाळीसारख्या सणांना मिठाईची मागणी प्रचंड वाढते. याच संधीचा फायदा घेऊन काही मोठे ब्रँड्स आणि विक्रेते जुना माल खपवण्याचा प्रयत्न करतात. अधिकाऱ्यांनी या छाप्यातून केवळ मिठाईच नाही, तर पेडा, रसगुल्ला, गुजिया आणि पनीरचे नमुनेही तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.

 

आता प्रश्न पडतो की आपण काय करायचं?

1. पाकीट नीट तपासा: पाकिटावरचा ब्रँड कितीही मोठा असला, तरी त्यावरची ‘मॅन्युफॅक्चरिंग डेट’ आणि ‘एक्सपायरी डेट’ वाचल्याशिवाय ते घेऊ नका.

2. वास आणि चव: मिठाई घेण्यापूर्वी ती वास घेऊन किंवा थोडी चाखून बघा. जर जरा जरी वेगळी चव लागली, तर ती घेऊ नका.

3. पावती नक्की घ्या: मोठ्या दुकानातून खरेदी करताना पक्कं बिल आवर्जून मागा. जेणेकरून काही त्रास झाल्यास तुमच्याकडे पुरावा असेल.

 

प्रशासन आपलं काम करतंय, छापे टाकले जातायत, माल नष्ट केला जातोय. पण ग्राहकाचा ‘विश्वास’ जेव्हा तुटतो, तेव्हा तो माल पुन्हा जोडता येत नाही. लखनऊमध्ये हा प्रकार उघडकीस आला असला तरी देखील देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी देखील अशाच मालाच पुरवठा केल्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रँडेड पाकिटातही जर ‘एक्सपायर्ड’ माल मिळत असेल, तर आता आपणच सतर्क राहण्याची गरज आहे. सण हा आनंदाचा आहे, तो हॉस्पिटलच्या वाऱ्या करण्यात घालवू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -