राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनंतर आता निवृत्तीवेतनधारकांसाठीही मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ नागरिकांवर वाढलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत सुधारित वेतनश्रेणीत निवृत्तीवेतन घेणाऱ्या पेन्शनर्सचा महागाई भत्ता २५२ टक्क्यांवरून २५७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे. मात्र वाढीव रकमेचा प्रत्यक्ष लाभ १ फेब्रुवारी २०२६ पासून मिळणार आहे. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जमा झालेली थकबाकी मार्च २०२६ मध्ये देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. उर्वरित थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश नंतर काढले जाणार आहेत.
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनावर मिळणारा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. तसेच पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन घेणाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली असून तो ४६६ टक्क्यांवरून ४७४ टक्के करण्यात आला आहे.
दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता निवृत्तीवेतनधारकांसाठीही वाढ जाहीर केल्यामुळे लाखो ज्येष्ठांना आर्थिक आधार मिळणार आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन खर्च भागवताना पेन्शनर्सना होणारी अडचण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. एकूणच, राज्य सरकारचा हा निर्णय पेन्शनर्ससाठी मोठा दिलासा मानला जात आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.






