रील बनवणाऱ्या अंजली देवीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूआधी अंजलीने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करून आपली व्यथा मांडली होती, परंतु यंत्रणा आणि समाजाच्या उदासीनतेमुळे तिचा जीव वाचू शकला नाही.
“मला मरायचं नाही, मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे, पण माझा पती मला मारून टाकू शकतो…” फेसबुकवर रडत रडत हे सांगणाऱ्या अंजली देवीची तिचा पती कुंदन साह याने हत्या केली.
अंजली देवी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असायची आणि अनेकदा रील्स बनवत असे. तिचा पती कुंदन कुमारला हे अजिबात आवडत नव्हतं. रील स्टार अंजलीच्या व्हिडिओनुसार, कुंदन तिला खाण्यासाठी काही देत नव्हता. तो स्वतः बाजारातून खाऊन यायचा, पण पत्नी आणि मुलांना जेवण देत नसे.
अंजलीने सांगितलं होतं की, जेव्हा ती काम करण्यासाठी बाहेर पडायची, तेव्हा पती तिच्यावर खोटे आरोप करायचा. अंजलीने हाजीपूरमधील एका क्लिनिकवर चुकीचे उपचार केल्याचाही गंभीर आरोप केला होता आणि एसपींकडे मदतीची मागणी केली होती. तिने सोमवारी धरणं आंदोलन करण्याबाबतही व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता.
अंजलीच्या मोठ्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सर्व काही सामान्य होतं. परंतु सोमवारी सकाळी जेव्हा मंदिरात गाणी वाजत होती, तेव्हाच वडील कुंदन यांनी दोरीने अंजलीचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत कुंदन साहला अटक केली आहे.
अंजली आणि कुंदनचं नाते एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हतं, पण त्याचा शेवट अत्यंत भयानक झाला. अंजलीचं पहिले लग्न समस्तीपूरमध्ये झालं होतं, तिला दोन मुलं होती. फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख वैशाली येथे राहणाऱ्या कुंदनशी झाली. २०२१ मध्ये दोघे मुंबईला गेले, जिथे कुंदनने तिला सोडून दिलं होतं.
अंजलीने हार न मानता कुंदनच्या घरी येऊन राहण्याचा मोठा निर्णय घेतला. कायदेशीर लढाईनंतर कुंदन जेलमध्येही गेला होता, पण बाहेर आल्यानंतर त्यांच्यातील वाद पुन्हा वाढला आणि अखेर फेसबुकवरून सुरू झालेल्या या प्रेमकथेचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.





