इचलकरंजी येथील मुख्य मार्गावरील कामगार चाळ प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीची गळती काढण्याचे काम वेळेवर पुर्ण न झाल्याने बुधवारी हजारो लिटर पाणी थेट गटारीत मिसळले. ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे पाहुन नागरीकांतून संताप व्यक्त होत होता.
ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील मुख्य मार्गावरील कामगार चाळ परिसरात नळांना दुषित पाणी येत असल्याने कामगार चाळ परिसर आणि प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनी तपासण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. हे काम वेळेवर पुर्ण झाले नाही. त्यामुळे बुधवारी दुपारी भागात पाणी पुरवठ्यावेळी सुमारे तासभर मोठ्याप्रमाणात पाणी थेट गटारीत मिसळत होते. या पाण्यामुळे भाग्यरेखा चित्रमंदिरासमोर मुख्य मार्ग जलमय झाला होता. गेल्या आठवड्यात थोरात चौक ते
महासत्ता चौक या मार्गावर जलवाहिनीला गळती लागुन मोठ्या प्रमाणात पाणी वाया
गेले. शहरात ४-५ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना प्रशासनातील समन्वयांच्या अभावामुळे उन्हाळ्यात वारंवार गळती लागुन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत होता.





