जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा मिती ज्येष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार दि. ७ जुलै २०२६ रोजी मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
तशी अधिकृत घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने करण्यात आली आहे. ७ जुलै रोजी पालखी चा विसावा इनामदार वाड्यात असणार आहे तर ८ जुलै रोजी पालखी इनामदार वाड्यातून पडेल.
मानाची पहिली आरती संत अनगडशा बाबा यांच्या दर्ग्यात होणार असून पालखी पुढे पंढरपुरा च्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी तीन प्रमुख विश्वस्तांची निवड करण्यात आली आहे.
त्यामध्ये ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांचा समावेश आहे. यंदाच्या पालखी रथासाठी संस्थानतर्फे नवीन व्यवस्था करण्यात येत आहे.
रथ ओढण्यासाठी तीन बैलजोड्या खरेदी करून रथास जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या ३४१ व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा ७ जुलै २०२६ रोजी देहूतून पंढरपूरकडे ही पालखी प्रस्थान करणार आहे.






