राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत मिळणार आहेत
बालभारतीच्या इतिहासात प्रथमच एका वर्षात चार इयत्तांची पाठ्यपुस्तके बदलली जात आहेत. बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ही नवीन पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी दिली.
पाठ्यपुस्तकांतील आशय विद्यार्थ्यांच्या वयानुसार निवडण्यात आला असून, अध्ययन निष्पत्ती आणि क्षमताधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला अध्ययन निष्पत्ती व आशय यांचा परस्परसंबंध स्पष्ट करणारा तक्ता देण्यात आला आहे. शिक्षकांसाठी अध्यापनाच्या सूचना तसेच प्रत्येक पाठाशी संबंधित मार्गदर्शक सूचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
पॉक्सो ई-बॉक्सची माहिती
नवीन पाठ्यपुस्तकांसाठी 70 जीएसएम दर्जाचा कागद वापरण्यात आला असून, मुखपृष्ठासाठी 170 जीएसएम कागदाचा वापर करण्यात आला आहे. पुस्तकांवर वॉटरमार्क, मुद्रकांची माहिती असलेले क्यूआर कोड, हीरक महोत्सवी लोगो तसेच टेली-मानस, मनोदर्पण, चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या ई-बॉक्सची माहिती दिली आहे.
त्रुटी असल्यास पुढील आवृत्तीत सुधारणा
पुस्तके बाजारात उपलब्ध झाल्यानंतर कोणतीही त्रुटी अथवा सुधारणा सुचवायची असल्यास नागरिकांनी बालभारतीशी संपर्क साधावा. प्राप्त सूचनांचा समितीमार्फत विचार करून आवश्यक असल्यास पुढील आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात येतील, असे देखील ओक यांनी स्पष्ट केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्पची चित्रे, सांकेतिक भाषा
नवीन पुस्तकांमध्ये सर्वसमावेशकतेवर विशेष भर देण्यात आला आहे. विविध धर्म, वेशभूषा, त्वचेचा रंग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारी चित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.
भारतीय ज्ञान प्रणाली
भारतीय ज्ञान प्रणाली, संविधानात्मक मूल्ये, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, लिंगसमभाव, सामाजिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये यांचा समावेशही नवीन पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता, संभाषणकौशल्य, नेतृत्व, संघकार्य आणि जिज्ञासा विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश केल्याचे बालभारतीने स्पष्ट केले आहे.






