एका गायीच्या असामान्य वर्तनाची गेल्या आठवडाभर जोरदार चर्चा होती. ही गाय सलग सात दिवस एका शेतात गोल-गोल फिरत राहिली.
त्यामुळे तिला पाहण्यासाठी आसपासच्या तसेच दूरवरच्या भागांतून लोकांची मोठी गर्दी जमू लागली. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याला चमत्कार मानण्यास सुरुवात केली. मात्र, पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या तपासणीत हा प्रकार कोणत्याही चमत्कारामुळे नव्हे, तर एका आजारामुळे घडत असल्याचे स्पष्ट झाले.
७ दिवस शेताभोवती फिरत राहिली गाय
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील बसभरिया पुरैना गावात ही घटना समोर आली. येथील ग्रामस्थांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता गायीने शेतात फिरण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती अधूनमधून थांबत असली तरी सात दिवस सतत त्याच शेतात गोल फिरत राहिली. तिच्या या वर्तनामुळे गावात विविध चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी याला दैवी चमत्कार मानले आणि शेतात जाऊन गायीची पूजा-अर्चा सुरू केली. काही भाविकांनी तर स्वतःही त्या शेताची परिक्रमा करण्यास सुरुवात केली.
गायीच्या दर्शनासाठी जमू लागली गर्दी
गावात वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. सोशल मीडियावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने लोक गावात येऊ लागले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील पशुवैद्यकीय पथक गावात पोहोचले आणि गायीची तपासणी केली.
‘सरी’ (हायपोग्लायसेमिया) आजाराने त्रस्त होती गाय
तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, गाय ‘सरी’ अर्थात हायपोग्लायसेमिया या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे जनावरांमध्ये असामान्य वर्तन दिसून येते. विशेषतः ते सतत एकाच दिशेने फिरणे किंवा गोल-गोल फिरत राहणे अशा हालचाली करू शकतात. डॉक्टरांनी गायीवर उपचार सुरू केले असून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
आठव्या दिवशी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी लोकांना समजावून सांगितले. त्यानंतर गायीला तिच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच पुन्हा गर्दी होऊ नये यासाठी कुटुंबीयांनाही सूचना देण्यात आल्या.
डॉक्टरांचे मत
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, योग्य उपचारांनंतर गाय हळूहळू पूर्णपणे बरी होईल. मात्र, तज्ज्ञांचा अहवाल समोर आल्यानंतरही काही लोक या घटनेकडे चमत्कार किंवा दैवी संकेत म्हणूनच पाहत आहेत. सध्या गावातील परिस्थिती सामान्य असून गाय पूर्णपणे बरी होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.





