Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी घालू नये;...

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी घालू नये; संभाजीराजे छत्रपती

जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसरकारला केले आहे.

कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी गेले अडीचशे दिवस आंदोलन सुरू असून आज आंदोलकांनी उग्र रूप धारण केले आहे. यावेळी काही आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करीत सरकारला या विषयात लक्ष घालून जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशी मागणी केलेली आहे.

छत्रपती संभाजीराजे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपट सृष्टीस उत्तेजन देण्यासाठी कोल्हापूर येथे स्टुडिओ सुरू केला. सध्या जयप्रभा स्टुडिओ या नावाने ओळखला जाणारा हा स्टुडिओ नंतरच्या काळात महाराजांनी हा स्टुडिओ केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरायचा या अटीवर सुप्रसिध्द चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सोपविला. बहुतांश नामांकित मराठी चित्रपटांचे शूटिंग हे याच स्टुडिओ मध्ये झालेले आहे. कित्येक हिंदी चित्रपट देखील याठिकाणी घडले. नंतर काही कारणांनी पेंढारकर यांनी देखील या स्टुडिओ वरील ताबा गमविला. कोल्हापूरच्या कलानगरीचा कणा असणारा हा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ अलिकडच्या काळात विकसकाच्या घशात घातला जात आहे. यामुळे या स्टुडिओचे अस्तित्व संपत चालले आहे.

याविरोधात कोल्हापूरात गेले २५० दिवस कलाक्षेत्राशी निगडीत जनतेचे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे. जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -