Homeब्रेकिंगभंडारा, महाप्रसादासाठी FDAची परवानगी बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा होईल दाखल

भंडारा, महाप्रसादासाठी FDAची परवानगी बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा होईल दाखल

भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा विचार करत असाल तर थांबा. तुमच्याकडे कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी आहे का ? नसेल तर तुमच्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होऊ शकते. कारण राज्यातील भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाने नोंदणी बंधनकारक केली आहे.

 

जर विनापरवाना असे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित आयोजकांवर थेट कायदेशीर कारवाई होणार असून, गरज पडल्यास गुन्हाही दाखल केला जाईल. अन्नातून विषबाधा होण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी आणि अन्न सुरक्षा तसेच स्वच्छता मानके राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

श्रावणापासून दिवाळीपर्यंत सण-समारंभांचा उत्सव सुरू असतो. या काळात कोल्हापूर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये महाप्रसाद आणि जेवणावळींचे आयोजन केले जाते. मात्र, अशा कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे आता बंधनकारक असणार आहे. अन्नपदार्थ तयार करणाऱ्या आयोजकांनी स्वच्छ व निर्जंतुक पाण्याचा वापर, स्वच्छ भांडी आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, तसेच मुदतबाह्य आणि नाशवंत पदार्थांचा वापर टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केलंय.

 

कोल्हापूर जिल्ह्यात नऊ अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाप्रसाद आणि जेवणावळींची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षा नियमांचा भंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांनी दिली आहे.

 

काय आहे नवा नियम

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाप्रसाद आणि भंडारा आयोजनासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात अन्नवाटप करण्यापूर्वी आयोजकांना अधिकृत नोंदणी किंवा परवाना घेणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

 

नोंदणी प्रक्रिया सुलभ, शुल्क अवघे शंभर रुपये

एफडीएने ही प्रक्रिया सुलभ केली आहे. ऑनलाइन पद्धतीने अवघ्या शंभर रुपयांमध्ये नोंदणी करून आवश्यक परवाना मिळवता येईल. दरम्यान सण-उत्सवांच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणी भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जात असते. मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने एफडीएने हा निर्णय घेतलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -