जळगाव जिल्ह्यातल्या यावलमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्याने (employee) आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आलीय. शिवाजी पंडित पाटील (वय 48) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बारीपाडा येथे रहायला होते. त्यांच्या खिशात आत्महत्येपू्र्वी लिहिलेली चिठ्ठी सापडलीय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी मार्च अखेरचा अल्टीमेटम दिला. त्या तणावातून पाटील यांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. पाटील गेल्या आठ वर्षांपासून यावल आगारात चालक म्हणून काम करत होते. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले आहेत. दिवाळीपासून त्यांनी विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाग घेतला होता. पाटील यांच्या उत्पन्नाची सारी मदार नोकरीवर होती. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचे हाल सुरू होते. काही काळ बहिणीने धान्य आणि कपडालत्ता पुरवला. मात्र, या फरफटीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
शिवाजी पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिलीय. त्यात ते म्हणतात की, माझी मन:स्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येचा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नाही, धन्यवाद. या घटनेने पाटील यांच्या पत्नी हिरकणीबाई, मुलगा हेमंत, मुलगी उत्तेषा आणि त्याच्या आई व भावाला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येची बातमी समजताच या कुटुंबाने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती.
एसटी विलीनीकरणावर सरकारने आपली नकारघंटा सुरू ठेवलीय. पगारवाढ करण्याच्या नावाखालीही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे समोर आले. अनेक जणांचे हजार, दोन हजार रुपयांनी पगार वाढवले. त्यामुळे संपकरी इरेस पेटले. महाराष्ट्राचा सरकारी प्रवास गाडा अक्षरशः थांबला आहे. ज्यांच्याकडे खासगी वाहने नाहीत आणि जिथे रेल्वे नाही, तिथे जाणे दुरापास्त झाले आहे. कोट्यवधी जनता या संपाने त्रस्त आहे, पण राज्य सरकारला यावर अजून तरी उपाय काढणे जमले नाही. हे सरकारेच घोर अपयश असल्याची भावना व्यक्त होतेय.