ताजी बातमी ऑनलाईन टीम
सातार्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा मंगळवारपासून (दि. ५) रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून मल्ल शाहूनगरीत दाखल होऊ लागले आहेत. या स्पर्धेसाठी ५ आखाडे तयार करण्यात आले असून त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आखाड्यांची पाहणी केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्यास आता अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. मंगळवारपासून सलग ४ दिवस जिल्हा क्रीडा संकुलात पैलवानांचा शड्डू घुमणार आहे. राज्यभरातून या स्पर्धेसाठी ९०० मल्ल येणार आहेत.
आज (सोमवार) पासूनच मल्ल सातार्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी दुपारपासून मल्लांचे वजन करण्यात येणार आहे. वजनानुसार गट निश्चित केले जाणार आहेत. सायंकाळी प्रत्यक्ष कुस्त्यांचा थरार सुरू होणार आहे. पहिल्या कुस्तीसाठी ५७ किलो वजनी गटातील मल्ल एकमेकांना भिडणार आहेत. त्यानंतर ७० व ९२ किलो वजनगटाच्या कुस्त्या होतील. सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ५ ते रात्री ९.३० दरम्यान कुस्त्या सुरु राहतील. कुस्त्यांसाठी तयार केलेले पाचही आखाडे पूर्णत्वाकडे गेले आहेत. व्यासपीठही तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, स्पर्धेच्या तयारीचा आढावा. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी घेतला. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, जिल्हा तालीम संघाचे साहेबराव पवार, दीपक पवार, संदीप साळुंखे, सुधीर पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.