ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएलमधील सर्वात यशस्वी राहिलेल्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा तीन गडी राखून पराभव केला. मुंबईचा यंदाच्या हंगामात हा सलग सातवा पराभव आहे. या पराभवासह मुंबईचे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
आतापर्यंत मुंबईची इतकी बिकट अवस्था कधीही झाली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात पहिले सात सामने गमावण्याची दारूण वेळ या संघावर आली. आतापर्यंत कोणत्याही संघाने आयपीएलमध्ये सुरुवातीचे सात सामने गमावलेले नाहीत. पाच वेळच्या विजेत्या मुंबईला सात सामन्यांनंतरही योग्य असे संतुलन मिळालेले नाही. त्याचा फटका मुंबईला आतापर्यंत बसला आहे. चेन्नईविरोधातही मुंबईला त्याच समस्येने सतावले. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
रोहित शर्मा, ईशान किशन, पोलार्ड, बुमराह यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच मुंबईचे आयपीएल स्पर्धेतील जवळपास आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म होय. या दोन्ही फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15 कोटींपेक्षा जास्त रुपयांना खरेदी केलेल्या ईशान किशनला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. ईशान किशन संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यांत किशनने दमदार खेळी केली. रोहित शर्माने 19 च्या सरासरीने फक्त 114 धावा केल्या आहेत. सात डावांत रोहित शर्माने 41, 10, 3, 26, 28, 6, 0 अशा धावा केल्या आहेत.
27 मार्च – दिल्लीकडून चार गडी राखून पराभव
2 एप्रिल – राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय
6 एप्रिल – कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून विजय
9 एप्रिल – आरसीबीचा मुंबईवर सात गडी राखून विजय
13 एप्रिल – पंजाबकडून मुंबईचा 12 धावांनी पराभव
16 एप्रिल – लखनौचा मुंबईवर 18 धावांनी पराभव
21 एप्रिल – चेन्नईचा मुंबईवर तीन गडी राखून विजय.