ताजी बातमी ऑनलाईन टीम
तुमच्या आजी-आजोबा, आई-वडिलांना ज्या समस्यांचा सामना करावा लागला त्याचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. कधी काळी दिल्लीतून सरकारी फाईल जम्मू-काश्मीरला पोहचायला दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागत असे. आता ५०० किलोवॅटचा सौर उर्जा प्रकल्प हा केवळ तीन आठवड्यात सुरु होत आहे. पुढील २५ वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची नवी कथा लिहिली जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील चिल्ली येथे जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यात ३७० कलम हटविल्यानंतर त्यांची ही पहिलीच जाहीर सभा होती.
कलम ३७० हटविल्यानंतर राज्यात लोकशाही मजबूत
या वेळी पंतप्रधान म्हणाले, “सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्राम पंचायतची वाटचाल ही देशातील पहिली कार्बन न्यूट्रल ग्राम पंचायत होण्याकडे सुरु आहे. विविध विकास कामांना राज्यात प्रारंभ झाला असून, यासाठी मी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो. यावर्षी आम्ही पंचायत राज दिवस हा जम्मू-काश्मीरमध्ये साजरा करत आहोत, हेच बदलाचे प्रतीक आहे. मी येथून देशातील सर्व ग्राम पंचायतींबरोबर संवाद साधत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर राज्यात लोकशाही मजबूत झाल्याचे हे प्रतीक आहे. जम्मू-काश्मीरच्या तळागाळात लोकशाही पोहचली आहे”.
जम्मू-काश्मीरमधील अनेक कुटुंबाना आता प्रॉपर्टी कार्ड मिळत आहे. राज्यात १०० जनऔषध केंद्रांमुळे गरीब आणि मध्य वर्गीयांना स्वस्त औषध आणि शस्त्रक्रियेचे साहित्य उपलब्ध होवू शकते, असेही त्यांनी सांगितले.