ताजी बातमी ऑनलाइन टीम
मुंबईचा माजी क्रिकेटपटू आणि 2006-07 रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य राजेश वर्माचे (Rajesh Verma Death) रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजेशच्या अकाली जाण्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. राजेशचा सहकारी भाविन ठक्कर (Bhavin Thakkar) याने राजेशच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
भाविन ठक्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजेश वर्माच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘राजेश या जगात नाही, यावर माझा विश्वासच बसत नाही. आम्ही दोघांनी अंडर 19 क्रिकेटची सुरुवात एकत्र केली होती. आम्ही दोघे वडाळ्यावरुन एकत्र प्रवास करायचो. राजेश आणि मी 20 दिवसांपूर्वी बीपीसीएल दौऱ्यावर होतो. मी त्या दिवशी राजेशसोबत जवळपास 30 मिनिटे गप्पा मारल्या. मात्र, आज पहाटे 4 वाजता राजेश गेल्याचे समजले. राजेश माझ्या जवळचा मित्र होता. तो हरहुन्नरी गोलंदाज होता. त्याच्या यॉर्कर बॉलचा सामना करणे फार अवघड होते.’ असं भाविन आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राजेश वर्मा हा मुंबईचा रहिवासी होता. तो मध्यमगती गोलंदाज होता. राजेशने 2002-03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 7 प्रथम श्रेणी सामन्यात प्रतिनिधित्व देखील केले होते.