स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड (ता. वेल्हे )येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने किल्ल्यावरील सात प्रवेशद्वारांचे दुर्गार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने सह्याद्रीचा परिसर दुमदुमून गेला .
छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वाधिक सहवास लाभलेल्या व स्वराज्याची पहिली सव्वीस वर्षे राजधानी असलेल्या किल्ले राजगडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यावतीने ३० एप्रिल ते १ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शनिवार ता. ३० रोजी किल्ले राजगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या जीवन पटावर आधारित लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते तर किल्ले राजगडावर पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते .किल्ल्यावरील पद्मावती देवी मंदिर ,महादेव मंदिर ,बालेकिल्ल्यावर विद्युत रोषणाई केली होती.





