साॅरी भावांनो ! असे व्हाॅट्सअपवर स्टेट्स ठेवून तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर (ता.वैजापूर) येथे घडली आहे. ज्ञानेश्वर कैलास चव्हाण ( रा.शिऊर, ता.वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा कुटुंबाबरोबर शिऊरच्या वरचा पाडा भागात राहत होता. सोमवारी (ता.दोन) रात्री तो घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने व्हाॅट्सअवर (Whatsapp) साॅरी मित्रांनो ! असे स्टेट्स ठेवले होते.
स्टेट्स पाहून त्याचा शोध घेतला असता शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, असे जवळच्या व्यक्तींनी सांगितले. या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलिस करित आहेत. ज्ञानेश्वर हा अविवाहित होता. शेवटच्या क्षणी त्याने व्हाॅट्सअपवर साॅरी भावांनो ! असे स्टेट्स ठेवून जगाचा निरोप घेतला. ज्ञानेश्वर हा मनमिळावू होता. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.