हवामान विभागाच्या नोंदवलेल्या ताज्या निरीक्षणाच्या आधारे, असनी चक्रीवादळाची तीव्रता सुरुवातीला जास्त होती, पण आता ती तीव्रता कमी झाल्याचं दिसतंय. पण जरी तीव्रता कमी झाली तरी किनारपट्ट्यांचे होणारे नुकसान हे जास्तच होऊ शकते. म्हणून आंध्रप्रदेश राज्याच्या किनारपट्टीला यामुळे ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. हे वादळ आज काकीनाडा किंवा विशाखापट्टणमजवळील पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचू शकते.
आता असं सांगण्यात येतंय की, मागील काही दिवसांपासून उष्णतेत वाढ होऊन अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा 40℃ च्याही पुढे गेला आहे. काही दिवसांत मॉन्सूनही सक्रिय होऊ शकतो. आता पुढील काही तासांमध्ये हे वादळ आंध्र प्रदेश राज्याच्या किनारपट्टीवर पोहचण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. विशाखापट्टणममधील आयएनएस देगा आणि चेन्नईजवळील आयएनएस राजली या नौदल हवाई स्थानकांवर बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण, तसेच गरज पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी तयार आहेत.
महाराष्ट्राचा विचार करता, सध्या एक-दोन दिवसांपासून वाऱ्याचे प्रमाण राज्यातील पुण्यासह काही इतर भागामध्ये वाढले असून ढगाळ वातावरण देखील काही जिल्ह्यांत पाहायला मिळाल्याने पावसाची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यानंतर उष्णतेची पातळी कमी होऊ शकतो. म्हणून ‘असनी’ चक्री वादळाच्या प्रभावामुळे आजही (ता. 11 मे) राज्यातील कोकणात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडाच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाने उष्णता वाढून हलक्या सरी बरसतील . हे वातावरण मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कर्नाटक, केरळ या भागात असणार आहे. अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
दरम्यान इतर राज्यांचा विचार करता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ओडिशा सरकारने चार किनारी जिल्ह्यांतील लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याची योजना आखली आहे. तर आज दिनांक 11 मे ला आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, तसा इशाराच देण्यात आला असून पुढच्या काही तासांमध्येच या किनारपट्टीच्या भागात असनी चक्रीवादळ एंट्री करणार आहे त्यामुळे या भागाला रेड अलर्ट देण्यात आला असल्याचं समजतंय.