ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना पहिल्यापेक्षा मजबुतीने उभी आहे. राज्यसभेत शिवसेनेचे एकही मत फुटलेले नाही. एकही शिवसैनिक गद्दार नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नाही, असे सांगून राज्यसभेत कुणी कलाकाऱ्या केल्या आहेत, ते कळलेले आहे, असे सूचक विधान करून दगाबाजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. आमदारांना हॉटेलात ठेवणं हिच आजची लोकशाही आहे, अशीही प्रतिक्रिया ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज (दि.१९) साजरा होत आहे.
त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये तळ ठोकून आहेत. याच ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विधान परिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.