सातारा (Satara) जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात काल (11 ऑक्टोबर) दिवसभरात सात जणांनी गळफास लावून आत्महत्या ( Suicide) केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
यात सहा पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यातील दोघांची कारणे समोर आली असून इतर पाच जणांनी आत्महत्या का केली याबाबत पोलीस शोध घेत आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुण आहेत. मात्र एकाच दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. वाढत्या आत्महत्येबाबत सध्या पोलिसांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आत्महत्या केलेल्यांची नावं
- साहिल कदम (वय 22 वर्षे), सातारा कोडोली – कारण अस्पष्ट
- राजेंद्र फाळके वय 32 वर्षे, कराड शहर राजमाची – कारण अस्पष्ट
- दिगंबर ओझरकर (वय 32 वर्षे), लोणंद शहर – कारण अस्पष्ट
- दिपाली जगताप (वय 36 वर्षे), रहिमतपूर निगडी कारण अस्पष्ट
- प्रकाश कदम (वय 38 वर्षे), फलटण बागेवाडी – कारण अस्पष्ट
- संजय जाधव (वय 53 वर्षे), बोरगाव भाटमरळी – कारण (त्याची मुलगी पळून गेल्याच्या कारणातून आत्महात्या)
- अनिल नलवडे (वय 35 वर्षे), बोरखळ – कारण (आर्थिक विवंचनेतून आत्महत्या)
दरम्यान साताऱ्यात याआधीही म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये विविध भागात एकाच दिवशी सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आजारपण, नैराश्य, आर्थिक विवंचना यातून त्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याचं समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा अशाच घटनेची सातारा जिल्ह्यात पुनरावृत्ती झाल्याने तरुणांमधील आत्महत्येचा विषय ऐरणीवर आला आहे.




