ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली : मुकादम आणि ऊसतोड कामगार पुरवतो असे सांगून राज्यातील ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकांची आतापर्यंत कोटयावधी रुपयांची फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर आलीयत. यामध्ये वाहतूकदार आणि शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. यामुळे हतबल झालेल्या ट्रॅक्टर मालकांनी आज रॅली काढत फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. दरम्यान, सांगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणापासून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रॅक्टर मालक ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, वाहतूकदार आणि शेतकरी यांना मुकादम आणि ऊस तोडणी कामगार पुरवतो असं सांगत वाहतूकदारांशी संपर्क करतात. त्यांनतर ऊस तोडण्यासाठी टोळी ठरवण्यासाठी लाखो रुपये ऍडव्हान्स घेतली जाते. तर सदर व्यक्ती पैसे घेऊन गायब होतात आणि वाहतूकदार आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतं. पैसेही बुडतात आणि ऊस तोडणी कामगारही मिळत नाही. त्यामुळे वाहतूकदार आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी आज ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकांनी मोर्चा काढत पोलीस प्रशासनाला फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.