पंधरा, वीस हजार रूपयांसाठी देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात मात्र चर्चा खोक्यांची, फडतूस अन् काडतुसांची सुरू आहे. त्यामुळे बळीराजाचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित झाले असून, स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी २० ते ३० श्री सदस्यांचा जीव घेणाऱ्यांना सामान्यांच्या व्यथा, वेदना काय समजणार? अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खास. राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, मागितल्याशिवाय मिळणार कसं? वीस-वीस लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणारे हे सरकार आहे. यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण ? स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी २० ते ३० लोकांचा जीव घेणाऱ्या लोकांना सामान्यांच्या व्यथा वेदना काय असणार? अक्षरशः पंधरा वीस हजार रूपयांसाठी देशामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र राज्यात मात्र चर्चा खोक्यांची फडतूस अन् काडतुसांची आहे,
ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित आहे.
शेट्टी पुढे म्हणाले, अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीबाबत सरकार ज्या-ज्या उपाययोजना करण्याच्या घोषणा करत आहे, त्यावर मी समाधानी नाही. गेली पंधरा दिवस शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचत नाही. दोन दिवसात नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही.सरकारी अधिकाऱ्यांच्या संपामुळे नीट पंचनामे झाले नाहीत. दररोज गारपीट होतेय मात्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सरकारबद्दल किव यायला लागली आहे. यांना शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही.








