जे राहुल गांधी यांनी सत्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्या विरोधात मोदी सरकार ही कारवाई करत आहे, असा आरोप आमदार पी. एन. पाटील यांनी मोदी सरकारवर केला. मोदी सरकारच्या विरोधात आज कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गुजरात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निकालाविरोधात त्यांनी गुजरात सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने देखील हा निकाल कायम ठेवला. यामुळे त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत या निकालाला आव्हान दिले. मात्र गुजरात उच्च न्यायालयाने देखील शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशाला आता माहीत झाली आहे.
मोदी आणि आदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश राहुल गांधी यांनी केल्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. असे म्हणत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार पी. एन. पाटील. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.