इचलकरंजी, येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत सातजणांचा चावा घेतला. यापैकी ६ जणांवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात तर एकावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहर व परिसरात भटकी जनावरे आणि कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भटकी जनावरे व कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणीही वारंवार होत असताना प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकातून महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक समोरील खाद्य पदार्थाच्या गाळ्यांसमोर भटक्या कुत्र्यांनी सातजणांना चावा घेऊन जखमी केले. शिवाजी आवबा बंडगर, संतोष तिमाप्पा दासर (दोघे रा. बंडगर माळ), सिद्धार्थ अनिल धुमाळ (रा. बावडे गल्ली), हरिहरण तंगवेल (रा. थोरात चौक), स्वप्निल गणेश पाटील (रा. रुकडी) आणि मंगेश गणपती पुजारी (रा. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
जखमीपैकी सहाजणांवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात तर गंभीर जखमी झालेल्या एकावर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.