शेतकऱ्यांना अवघ्या चार तासांत शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज ऑनलाइन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सहकार्याने राबवल्या जात असलेल्या या योजनेत बँकेतर्फे आतापर्यंत राज्यभरात १०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.आता गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या आधारे शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे किंवा महामंडळाच्या राज्यातील २०२ गोदामांमध्ये जाऊन शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन ओळख पडताळणी प्रक्रिया (केवायसी) पार पडल्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे थेट बँकेच्या मुख्यालयात येतो. कागदपत्रांची छाननी करून ऑनलाइन पद्धतीनेच शेतकऱ्याच्या गोदाम पावतीवर कर्जाचा बोजा चढवून खात्यात कर्जाची रक्कम जमा होते.बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आतापर्यंत ४,५४३ अर्जांद्वारे बँकेने शंभर कोटी रुपयांचे कर्जवितरण केले आहे, असे अनास्कर यांनी सांगितले.
पूर्वी गोदामात ठेवलेल्या शेतमालावर कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना किमान चार दिवस थांबावे लागत होते. आता कर्ज अवघ्या चार तासांत मिळते. संबंधित शेतकरी राज्य सहकारी बँकेचा खातेदार नसला तरीही कर्ज मिळते. यामुळे हे फायदेशीर आहे.सोयाबीन, हळद, तूर, मका, हरभरा डाळ आदींसाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. यामुळे ही एक फायदेशीर योजना ठरत आहे.