देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे त्यांना कंटाळून आम्ही घर सोडून जात असल्याचे घरामध्ये ठेवलेल्या डायरीमध्ये लिहून ठेवून एक 33 वर्षीय तरुण पत्नी व त्यांच्या तीन मुलांसह असे एकूण पाच जणांचे कुटुंब ता 14 ऑगस्ट रोजी पूळुजवाडी (ता. पंढरपूर) येथून निघून गेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पाच जण बेपत्ता झाल्याची नोंद ता 19 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोहोळसह पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार, सुदाम रामचंद्र यादव रा. पुळुजवाडी ता. पंढरपूर हे कुटुंबासमवेत राहत असून त्यांचा मोठा मुलगा तात्यासाहेब सुदाम यादव हा किराणा दुकान चालवतो. 14 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान तात्यासाहेब यादव यांनी चार चाकी गाडीचा चालक चेतन घाडगे याला फोन करून बोलावून घेतले.आम्हाला दवाखान्यात जायचे आहे .
मोहोळ येथे सोड ,असे सांगितले. त्या अगोदर त्याने घरामध्ये मोबाईलचे सिमकार्ड काढून ठेवून मला देणे जास्त झाल्यामुळे तसेच देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे मी त्यांना कंटाळून घर सोडून पत्नी व तीन मुलांना घेऊन निघून जात आहे, असे डायरीमध्ये लिहून ठेवले.त्यानंतर कुटुंबीयांनी तीन दिवस नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र ते घरी न आल्याने बेपत्ता तात्यासाहेब यादव यांचे वडील सुदाम यादव यांनी मुलगा तात्यासाहेब यादव (वय 33), कोमल तात्यासाहेब यादव (वय 29), मुलगी राजनंदिनी (वय 5), मुलगा यशराज (वय 4), तिसरा मुलगा राजकुमार (वय 2) असे एकूण पाच जण घरातून निघून मोहोळ येथील बस स्थानक येथून ता 14 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता पासून घरात कोणालाही काहीही नाही सांगता बेपत्ता असल्या बाबतची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.