Monday, June 2, 2025
Homeराजकीय घडामोडीउपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजीचा खेळ करत दुसऱ्यांदा शिंदे गटाचा केला 'गेम'!

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजीचा खेळ करत दुसऱ्यांदा शिंदे गटाचा केला ‘गेम’!

राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला (Shinde Group) कात्रजचा घाट दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे नाराज अजित पवार पुन्हा एकदा कोणता मोठा निर्णय घेणार का? इथपर्यंत ही चर्चा जाऊन पोहोचली होती. मात्र, आता या नाराजीचा सर्व उलगडा आज ( 4 ऑक्टोबर) एका क्षणामध्ये झाला आहे. राज्यातील सुधारित पालकमंत्री (New Guardian Ministers) जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

 

 

राज्यातील 12 जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. या यादीमध्ये पूर्णतः अजित पवार गटाचा वरचष्मा राहिला आहे. या यादीमध्ये अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पुण्यातून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी घेतली आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर कोल्हापूरमधूनही शिंदे गटाची उचलबांगडी करण्यात आली आहे. याठिकाणी दीपक केसरकर यांना पालकमंत्री पदावरून बाजूला करून त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांच्या बीड जिल्ह्याचे याच पालकत्व देण्यात आलं आहे.

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदामध्ये सर्वाधिक चर्चा रायगडच्या पालकमंत्री पदावरून रंगली होती. त्या ठिकाणी शिंदे गटाने केलेल्या दाव्यामुळे त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाणार कोणाकडे याची चर्चा अजूनही आहे. रायगड जिल्ह्यासह सातारा आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे एकंदरीत या जिल्ह्यावरून तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा धुमशान होण्याची चिन्हे आहेत.

 

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली, अशी स्थिती मुख्यमंत्री शिंदे गटाची राहिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला गेले होते. या भेटीमध्येच पालकमंत्रीपदाचा निकाल लागला आहे. त्यामुळे आता एकंदरीतच एकंदरीत पालकमंत्रीपदाचा तिढा काहीसा सुटला असला, तरी शिंदे गटाची नाराजी पुन्हा एकदा वाढत जाण्याची शक्यता आहे. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असतानाही शिंदे गटांतील नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप केले होते. आता सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुद्धा अजित पवार यांचाच वरचष्मा राहत असल्याने शिंदे गटाची अवस्था बिकट होत चालली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -