भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? हा प्रश्न सातत्याने चर्चेत येतो. पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून कोणतीही निवडणूक जवळ आली की पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येतं.
पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी चर्चेत आलं, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्यावेळी देखील पंकजा यांचं नाव सातत्याने चर्चेत येतं. पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. बीडमधील मोठा जनसमुदाय पंकजा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे.
पण तरीदेखील भाजपकडून अद्याप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं असताना आज पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी जनतेला थेट साकडंच घातलं आहे. त्यांच्या या भावनिक आवाहानाला जनता प्रतिसाद देते का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण त्यांच्या भावनिक आवाहानाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
“लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे आज सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केलं.
“मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ? असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.