संचित तोटा 9 हजारांवर आलेल्या एस.टी. महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावावर गुरुवारी (दि. 23) मंत्रालयात होणार्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होताच गुरुवारी रात्रीपासून म्हणजेच शुक्रवार (दि. 24) पासून एस.टी.ची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेसाठी एस.टी.चा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे.
एस.टी. महामंडळ राज्यभरात दररोज सुमारे 14 हजार बसेसच्या माध्यमातून 55 लाख प्रवाशांची वाहतूक करते. त्यातून महामंडळाला दिवसाला अंदाजे 23 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तथापि, महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचे गणित काही बसत नाही. त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. यास्तव महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला. महामंडळाने राज्य सरकारला 14.13 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यापूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी महामंडळाची 17.17 टक्के भाडेवाढ झाली होती.