वसईत दोन मोटारसायकल स्वारांचा समोरासमोर येऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
वसई पूर्वमधील मधुबन परिसरात रात्रीच्या सुमारास वाहनाची मोठी वर्दळ असते. मुख्य रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने वेगाने चालतात. त्यामुळे अपघातच्या घटनेत वाढ होत आहे. मधुबन परिसरात रस्ता मोकळा असल्याने वाहने वेगाने चालवली जातात. काल रात्री ८ च्या सुमारास हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आणि स्कूटी यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्हीही बाईक्सचा चक्काचूर झाला. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.
परिसरात हळहळ व्यक्त
या अपघाताची माहिती मिळताच वालीव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. तसेच हे मृतदेह शवविच्छेदनासाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मुंबई-आग्रा हायवेवर अपघात
तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळे रस्ते अपघात झाले आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अपघात शनिवार आणि शुक्रवारी रात्री घडले. त्यापैकी एक अपघात ट्रक वेगाने आणि चुकीच्या दिशेने येत असल्याने झाला. तर दुसरा अपघात ट्रकच्या ब्रेक फेल झाल्यामुळे झाला.