येथील वेताळ पेठ परिसरातील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. तर पत्नीच्या मृत्यमुळे अस्वस्थ झालेल्या पतीने अंकली पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संपत शिकलगार असे त्यांचे नाव आहे. या प्रकारामुळे सदर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
विषारी द्रव्य प्राशन केलेल्या राखी संपत शिकलगार (रा. वेताळपेठ परिसर) या विवाहितेचा गुरूवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेल्या पती संपत शिकलगार याने अंकली येथील कृष्णा नदीवरील पुलावरून नदीत उडी घेवून जीव देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद सांगली पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
येथील वेताळपेठ परिसरात संपत शिकलगार कुटुंबियांसह राहण्यास आहे. संपत यांच्या पत्नी राखी यांना २५ फेब्रुवारी रोजी विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारासाठी प्रथम आयजीएम येथे तर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संपत हे सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्येच होते. पत्नी राखी हिच्या मृत्यू झाल्याने ते अस्वस्थ बनले. हॉस्पिटलमधून त्यांनी इचलकरंजीकडे जाण्यासाठी रिक्षा केली.अंकली पुलावर आल्यानंतर त्यांनी रिक्षा थांबवण्यास सांगून थेट नदीत उडी घेवून जीव देण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालकासह नागरिकांनी सतर्कता दाखवून याची माहिती सांगलीच्या आयुष्य हेल्पलाईन पथकाला कळवली. टिमने तातडीने धाव घेत संपत यांना नदीतून बाहेर काढले. या घटनेत संपत हेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राखी व संपत या दाम्पत्याला दोन मुले आहेत. घटनेची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी घराजवळ गर्दी केली होती. राखी यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच पती संपत यांनीही जीव देण्याचा प्रयत्न केल्याने कुटुंबियांसह नातेवाईकांना धक्का बसला. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती. याबाबतची माहिती सांगली पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यांत येत होती.