मोठी बातमी समोर येत आहे, चाळीसगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. कन्नड घाटाच्या पायथ्याला हा अपघात झाला आहे. चालकाचा पिकअप वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप कठाड्याला धडकलं, हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत आणि जखमी सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. देवदर्शनाहून परतताना हा अपघात झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या चाळीसगाव येथील कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन प्रवासी जागीच ठार, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात अन्य आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी आणि मृत व्यक्ती सर्व एकाच कुटुंबातील होते. ते सर्व जण देवदर्शनासाठी गेले होते.
छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगावकडे येत असताना पिकअप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन वळणावरील कठड्याला जोरदार धडकले. या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर करंबळेकर यांनी दिली आहे. या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.