जिल्ह्यात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न पडण्याइतपत खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी ते आजअखेर महिला, युवकांसह वृद्धांचेही मुडदे पडले आहेत. आतापर्यंत 25 जणांचा खून करण्यात आला.
शहरातील खुनाच्या घटनांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीतून घडलेल्या गुन्ह्यांसह टोळीच्या वर्चस्ववादाची किनार दिसून येते. किरकोळ वाद, तणाव, चारित्र्याच्या संशयातून खुनीहल्ले झाले. सांगली, मिरज शहरांसह इस्लामपूर हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या. पोलिसांनी सर्वच घटनांचा छडा लावत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे मुडदे पडू लागले आहेत.
जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत खुनाच्या घटनांत वाढ झाली आहे. मे महिन्यातच शहरात दोन खून झाले. त्यात एका सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा समावेश होता. कुपवाडमध्येही कुख्यात गुंडाच्या टोळीतील गुंडाचा खून करण्यात आला. इस्लामपूर शहरात सराईत गुंडावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून झाला. या घटना सलग घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडासोबतच किरकोळ वादातून वाढता तणाव विकोपाला जाऊन खुनाच्या घटना घडल्या. पती-पत्नीचे भांडण, पूर्ववैमनस्य, चारित्र्याचा संशय, अनैतिक संबंध, टोळ्यांमधील वर्चस्ववाद अशा घटना घडत आहेत.
अल्पवयीन मुलांकडून खून
सांगलीवाडी परिसरातील सेंट्रिंग कामगाराच्या खुनात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते, तर सह्याद्रीनगर येथील गुंडाच्या खुनात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग स्पष्ट झाला होता. खुनासारखे गंभीर गुन्हे अल्पवयीन मुलांकडून होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षात 51 खून
जिल्ह्यात 2023 साली 66 खून झाले होते. यंदा त्यात 15 ने घट झाली. 2024 मध्ये खुनाच्या 51 घटना घडल्या. यात अनैतिक संबंध, जमिनीचे वाद, आर्थिक वाद, चारित्र्याचा संशय, पूर्ववैमनस्य आदी कारणांमुळे खुनाच्या घटना घडल्या होत्या. अगदी किरकोळ कारणावरूनही खुनाचे प्रकार घडत आहेत. अगदी 50 रुपयांसाठी तरुणाचा मुडदा पाडण्यात आला आहे.
क्रूरता येते कोठून?
जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षाच्या चिमुरडीचा 45 वर्षांच्या पांडुरंग सोमनाथ कळ्ळी या नराधमाने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत गुंडाळून ठेवला होता. तसेच आयर्विन पुलाखाली पतीने पत्नीचा गळा चिरला. अशा घटना पाहता, इतकी क्रूरता येते कोठून, असा प्रश्न पडतो. कोयता, चाकू, ऐडका अशी धारदार हत्यारे सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी कृत्याला बळच मिळत आहे.