आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत इतिहास रचला जाणार आहे. कारण आतापर्यंत एकदाही जेतेपद न मिळालेले दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. 3 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हे दोन संघ जेतेपदासाठी लढणार आहेत. या दोन्ही संघांना गेल्या 17 वर्षापासून जेतेपदाची आस आहे. यापैकी एकाचं स्वप्न या पर्वात पूर्ण होणार हे नक्की. तर एकाच्या पदरी निराशा पडणार आहे. अंतिम फेरीपूर्वी या दोन्ही संघांची आतापर्यंतच्या आयपीएल स्पर्धेतील आकडेवारी पाहूयात. जेणेकरून कोणता संघ भारी पडू शकतो याचा अंदाज येईल . आतापर्यंत दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत 36 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 18 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील अंतिम फेरीचा सामना तुल्यबल असेल यात काही शंका नाही.
आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत आरसीबी आणि पंजाब किंग्स चौथ्यांदा अंतिम फेरीत भिडणार आहे. यापूर्वी झालेल्या तीन पैकी दोन सामन्यात आरसीबीने बाजी मारली आहे. साखळी फेरीतील पहिला सामना पावसामुळे 14 षटकांचा झाला होता. यात पंजाब किंग्सला 96 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 12.1 षटकात पंजाबने पूर्ण केलं. दुसऱ्या सामन्यात आरसीबीने कमबॅक केलं. पंजाब किंग्सला 20 षटकात 157 धावांवर रोखलं. तर हे आव्हान 18.5 षटकात पूर्ण केलं. क्वॉलिफायर 1 फेरीत आरसीबीने पुन्हा पंजाबला पराभवाची धूळ चारली. पंजाब किंग्सला 20 षटकंही पूर्ण खेळू दिली नाहीत. 14.1 षटकात पंजाबला 101 धावा करता आल्या. तसेच आरसीबीने हे आव्हान 2 गडी गमवून 10 षटकातच पूर्ण केलं.
अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यापूर्वी तीनदा धडक मारली आहे. तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर पंजाब किंग्सने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली तेव्हा पराभवाच तोंड पाहावं लागलं होतं. विराट कोहलीने 35 डावांमध्ये 1116 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. ही आरसीबीची जमेची बाजू आहे. तर पंजाब किंग्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल 28 विकेटसह आघाडीवर आहे. आता अंतिम फेरीत दुखापतीतून सावरून त्याच्या मनगटाला बळ मिळतं का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.