नोकरीत असताना बसलेल्या विजेच्या धक्क्यांमुळे झालेल्या जुन्या जखमांच्या असह्य वेदनांना कंटाळून सुकुमार दत्तू बळे (वय 74, रा. आंबेडकर चौक, गडमुडशिंगी) या निवृत्त वीज कर्मचार्याने रविवारी दुपारी आपली जीवनयात्रा संपवली.
त्यांनी गावातील स्मशानभूमीच्या शेडमधील लोखंडी अँगलला चादरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बळे हे वीज कंपनीत कार्यरत असताना, त्यांना अनेकदा विजेचे धक्के बसले होते. यामुळे त्यांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या होत्या. या वेदना त्यांना वर्षांनुवर्षे त्रस्त करत होत्या. अखेर, शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
स्मशानभूमीजवळून जाणार्या एका नातेवाईकाने हा प्रकार पाहिला व तत्काळ आरडाओरडा करून इतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांना बोलावले. त्यांनी बळे यांना खाली उतरवून तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सुकुमार बळे यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने बळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.