लग्नानंतर मध्य प्रदेशातील एक जोडपं हनीमूनसाठी मेघालयला गेलं. तिथे गेल्यानंतर अचानक एक दिवस कुटुंबियांशी या जोडप्याचा संपर्क तुटला. 2 जूनला या जोडप्यातील एकाचा राजा रघुवंशीचा 2000 फूट खोल दरीत मृतेदह सापडतो. पत्नी सोनम रघुवंशी मात्र गायब असते. हनिमूनला गेलेल्या जोडप्यातील एकाची हत्या, दुसरा गायब त्यामुळे सगळेच चक्रावून जातात. रघुवंशी कुटुंबाकडून CBI चौकशीची मागणी केली जाते. त्यानंतर 8 जूनला अचानक सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमधील एका धाब्यावर येते. तिथून आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधते. त्यानंतर सूत्र वेगाने फिरतात. सोनमला उत्तर प्रदेश पोलीस ताब्यात घेतात आणि सगळ्यांनाच हादरवून सोडणारं एक धक्कादायक सत्य समोर येतं. पती राजा रघुवंशीची हत्या कुठल्या टोळीने लुटीच्या, चोरीच्या उद्देशाने नाही, तर पत्नी सोनमनेच घडवून आणल्याच धक्कादायक वास्तव समोर येतं.
गाझीपूर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. लुटारुंनी चोरीच्या उद्देशाने राजा रघुवंशीची हत्या केली असं तिने सांगितलं. पण ती त्यांच्या तावडीतून कशी निसटली हे तिला सांगता आलं नाही. सुरुवातीला सोनम हेच सांगत होती की, ‘मी नवऱ्याची हत्या केलेली नाही. दागिन्यांसाठी चोरांनी हत्या केली’. या प्रकरणात आकाश राजपूत (21), विशाल सिंह चौहान (21), राज कुशवाह (21) या तिघांना इंदूरमधून तर आनंद कुर्मीला (23) सतना एमपीमधून अटक केली. यात आरोपी राजा कुशवाह सोनमचा प्रियकर आहे. त्याच्या मदतीनेच तिने नवरा राजा रघुवंशीची हत्या घडवून आणली.
राज कुशवाह सोनमच्या घराजवळ रहायचा. तिचा फॅमिली बिझनेस आहे. तिथे राज कुशवाह नोकरी करायचा. वर्षभरापूर्वी कुशवाह तिच्या घरापासून रहायला लांब गेला. पण त्यांच्यात कारखान्यात नोकरी करायचा. पोलिसांनुसार सोनमच्या कुटुंबाचा या प्रेमसंबंधांना विरोध होता. सोनमच लग्न झाल्यानंतर चार दिवसांनी ती लग्नानंतरच्या विधीसाठी माहेरी आली होती. याचवेळी तिने राज कुशवाहसोबत मिळून नवरा राजा रघुवंशीच्या हत्येच प्लानिंग केलं. राजाला मार्गातून हटवल्यानंतर आपण पुन्हा एकत्र येऊ असं तिला वाटत होतं.
हत्येसाठी वापरलेलं शस्त्र कुठे खरेदी केलं?
मेघालय येथे हनिमूनवर असताना सोनम राज कुशवाहला सतत आपलं लोकेशन पाठवत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुवहाटीच्या कामाख्य मंदिरात दर्शन घेतल्यापासून मारेकरी या जोडप्याच्या मागावर होते असा पोलिसांना विश्वास आहे. पोलिसांनुसार, राज कुशवाह इंदूरमध्येच होता. पण आकाश, विशाल आणि आनंद ट्रेनने आसामला गेले. हत्येसाठी वापरलेलं शस्त्र गुवहाटीमध्ये खरेदी केलं. सोनमने शिलॉन्गमधील मुक्काम वाढवण्यासाठी नवऱ्याला राजी केलं. त्याचं मन वळवलं. पोलिसांनुसार हा सर्व कटाचाच भाग होता. सर्व आरोपींची एकत्र चौकशी केल्यानंतर संपूर्ण कटाचा उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं. सोनमच्या पालकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या मुलीला कटात अडकवल जातं आहे, असा आरोप सोनमचे वडिल देवी सिंह यांनी केला आहे.