प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शासकीय सुटीच्या दिवशीही काही शाळांनी उपस्थितीची नोंद करत विद्यार्थ्यांसाठी आहार शिजवल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील सुमारे 164 शाळांनी इंधन बिलासाठी पोर्टलवर माहिती भरताना गुरुनानक जयंती, तसेच एका रविवारी शाळेला सुटट्टी असताना आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिल्याचे दाखवले आहे.
संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्यांना शिक्षण विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. साधारणतः 1 लाख 64 हजारांची ही बिले इंधन बिलांतून कपात केली जाणार असल्याचे समजते..
पोषण आहार योजनेतून शाळेच्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे आणि दिलेल्या आहाराची नोंद शासनाच्या पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने सर्वच शाळा दैनंदिन उपस्थितीची नोंद पोर्टलवर करत असतात.
शाळांनी केलेल्या नोंदीच्या आधारे शाळांची इंधने भाजीपाल्याची बिले ऑनलाईन पद्धतीने काढली जातात. तसे अनुदान शाळांच्या खात्यावर वर्ग केले जाते. दरम्यान, राज्यासह जिल्ह्यातीलही अनेक शाळांनी गुरुनानक जयंतीच्या दिवशी सुटी असताना, तसेच रविवारी सुटी असतानाही विद्यार्थ्यांना आहार दिल्याची नोंद पोर्टलवर केल्याचे दिसून आले.
या प्रकरणाची शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नगर जिल्हा परिषदेला एक पत्र काढून, याद्वारे जिल्ह्यातील सर्व शाळांचा एएमएस पोर्टलवर उपस्थित नोंदीचा आढावा घेऊन शासकीय सुटीच्या दिवशी ज्या ज्या शाळांनी उपस्थितीची नोंद केली असेल, अशा शाळांची एकत्रित माहिती शासनाकडे पाठवावी, शासनाची फसवणूक करणार्या शाळांविरोधात प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 110 तर माध्यमिकच्या 53 शाळा व ऊर्दूची एक अशा 164 शाळा असल्याचे समजते.
मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार: वाकचौरे
पोषण आहाराचा मोठा गोंधळ आहे. अनेकदा आहार निकृष्ट असतोच. अनेक शाळांमध्ये दप्तरही व्यवस्थित लिहिलेले नसते. पोषण आहार येतो किती अन् शिजवला जातो की, अपूर्ण कोटा आला तर त्याचे रोख पैसे देण्याची तरतूद आहे, ते दिले जातात का, याशिवाय इंधन बिले काढले किती जातात, प्रत्यक्षात हा खर्च होतो किती.. हा सर्व संशोधनाचा विषय आहे. मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे जि.प. भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले.
तांत्रिक बिघाडामुळे हा गैरसमज: नरसाळे
कोणत्याही मुख्याध्यापकांनी हे जाणीवपूर्वक केलेले नसून यात एमडीएम पोर्टल व अॅप यातील तांत्रिक कारणांमुळे सुटीच्या दिवशी उपस्थिती नोंदवल्याचे दिसत आहे. यामध्ये कोणाचाही अपहार करण्याचा उद्देश नाही.
याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करू नये अशी संघटनेची भूमिका आहे. याबाबत लवकरच शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून विनंती करणार आहोत, असे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष भास्कर नरसाळे यांनी सांगितले.
– आनंद भंडारी, सीईओ, जि.प. नगरएका सुटीच्या दिवशी आहार शिजवलेल्या जिल्ह्यात साधारणतः 164 शाळा असल्याचे समोर आले आहे. यातील जिल्हा परिषदेच्या 110 शाळांबाबत गटशिक्षणाधिकार्यांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांकडून खुलासा मागावला आहे. तसेच माध्यमिकच्या 53 शाळा संदर्भातही माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्यांना तशा सूचना केल्या आहेत.