जिल्ह्यामध्ये नवीन नगरपालिका व नगरपंचायती झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीतून हुपरी, आजरा, शिरोळ, हातकणंगले, चंदगड या पाच मतदारसंघांची नावे गायब होणार आहेत.
त्याऐवजी या गावांच्या शेजारी असलेल्या मोठ्या गावांच्या नावाने मतदारसंघ तयार करण्यात येतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदारसंघांबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची माहिती निवडणूक आयोगाने मागितली आहे. ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतींची नगरपालिकेत रूपांतर करण्याची मागणी होती. त्यानुसार महायुतीच्या काळात हुपरी, आजरा, शिरोळ, हातकणंगले, चंदगड या ग्रामपंचायतींचे टप्प्याटप्प्याने नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यात आले. यामध्ये हुपरी वगळता सर्व तालुक्यांची ठिकाणे आहेत. तसेच या गावांच्या नावानेच जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. ही गावे मोठी असल्यामुळे राजकीयद़ृष्ट्यासुद्धा या गावांकडे राजकीय नेतेदेखील जाणीवपूर्वक लक्ष देत होते; परंतु या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून ही गावे वगळण्यात आली आहेत.
नगरपालिकेत रूपांतर झाल्यामुळे या पाच ग्रामपंचायतींना लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या नऊ मतदारसंघांची रचना कमी- अधिक प्रमाणात बदलणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांच्या पुनर्रचनकडे लक्ष लागून राहिले आहे.
मतदारसंघांची संख्या कमी होणार..?
जिल्हा परिषदेचे 67 आणि पंचायत समितीचे 134 मतदारसंघ आहेत. नगरपालिकेत रूपांतर झालेल्या पाच ग्रामपंचायती जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातून बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागणार आहे. नगरपालिकेत रूपांतर झालेली सर्व गावे ही तालुक्यातील मोठी गावे असल्यामुळे मतदारसंघांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.