भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. कारण यापूर्वी 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिलच्या नेतृत्वात 17 वर्षांनी इतिहास रचला जाणार की नाही? याकडे लक्ष लागून आहे. 20 जूनला पहिला कसोटी सामना असून दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. असं असताना या मालिकेत टीम इंडियाच्या पाच कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. या पाच आव्हानांवर मात केली तर टीम इंडियाला मालिकेवर पकड मिळवता येईल. टीम इंडियासमोर कोणती पाच आव्हानं आहेत ते जाणून घेऊयात..
टीम इंडियासमोर ही पाच आव्हानं
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि पहिलं आव्हान हे जसप्रीत बुमराहचं आहे. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. जसप्रीत बुमराह फीट असला तर टीम इंडियाला मोठा आधार मिळणार आहे. पण पाठीची दुखापत आणि वर्क लोड मॅनेजमेंटमुळे पाच सामन्यात खेळणं कठीण आहे. बुमराह संघात नसला की संघाची गोलंदाजी तितकी प्रभावी ठरणार नाही.
दुसरं कमकुवत बाजू म्हणजे खुद्द कर्णधार शुबमन गिल आहे. त्याचं असं की, शुबमन गिलचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यात फक्त 88 धावा केल्या आहेत. खराब फॉर्ममुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दबाव वाढणार आहे.
भारतीय फलंदाजांना स्विंग खेळताना अडचण येते. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुभवाची उणीव भासणार आहे. अशा स्थितीत केएल राहुलकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. दुसरीकडे, जयस्वाल आणि गिलकडे तितका अनुभव नाही.
चौथी कमकुवत बाजू म्हणजे क्षेत्ररक्षण.. भारतीय खेळाडूंना ड्यूक्स चेंडूसोबत क्षेत्ररक्षण करताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. झेल सोडल्याने अनेक सामने गमवण्याची वेळ आली आहे.
पाचवी कमकुवत बाजू म्हणजे शुबमन गिलच्या नेतृत्वात नवा कोरा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यात काही खेळाडूंना अनुभव नाही. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विनची उणीव भासणार आहे. अशा स्थितीत रवींद्र जडेजा आणि केएल राहुलकडून फार अपेक्षा असतील.