केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ पुण्यात पार पाडला, या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यापूर्वी एकदा चिकोडी येथे बोलताना शरद पवार यांनी जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक असं म्हटलं होतं. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं समजायचं का? असा सवाल यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी एकदा चिकोडी येथे बोलताना शरद पवार यांनी जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक असं म्हटलं होतं. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं समजायचं का? असं आहे, आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं, म्हणजे एकनाथ शिंदे यांचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि मराठीवरचं प्रेम कमी झालं, महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं, इतका संकुचित विचार मराठी मणसाला शोभत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलं आहे. याच मराठी माणसानं मोगली सत्ता घालवण्याचं काम केलं आहे, त्यामुळे एवढा संकुचीत विचार कोणी या ठिकाणी करत असेल तर ते चुकीचं आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांकडे आता मुद्देच राहिलेले नाहीत, त्यांचा लोकांशी टचच राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहीत नाही, आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलत आहेत, खर म्हणजे ज्याचा लोकांवरही काही परिणाम होत नाही, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.