भारतीय हवामान विभागाकडून पुढील दोन ते तीन दिवस उत्तर – पश्चिम भारत आणि पुढचे चार ते पाच दिवस मध्य भारतामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारातामध्ये पुढील 48 ते 72 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभू्मीवर हवामान विभागाकडू अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ, तटीय कर्नाटक, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, ओडिशा राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 48 ते 72 तासांमध्ये अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसाठी पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर विदर्भातही हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
दरम्यान गेले काही दिवस राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे, विदर्भात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. नागपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच फटका बसला, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळालं. तर गडचिरोली जिल्ह्यात तब्बल सहा तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संर्पत तुटला होता. आता पुन्हा एकदा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे.