सांगलीसह जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. सकाळी ऊन, दुपारी पाऊस आणि सायंकाळी थंडी असे विचित्र हवामान बहुतेक ठिकाणी होते. दरम्यान, या पावसाचा द्राक्षबागासह खरिपातील काढणीला आलेल्या पिकांना बसला आहे.
यंदा मे महिन्यापासूनच सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे. मे, जून, जुलै महिन्यांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काहीकाळ पावसाने ओढ दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस जोरदार झाला.
आता पावसाने उघडीप दिली असे वाटत होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून तापमान वाढल्याने उकाडा चांगलाच वाढला होता. बुधवारी सकाळीही ऊन पडले होते. मात्र सकाळी 11 च्या सुमारास ढग आले.
सांगलीत तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सांगलीसह मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्यांची तारांबळ उडाली. यंदा सततच्या पावसाचा फटका शेतकर्यांना बसला आहे. ऐन खरीप पिकाच्या काढणीवेळी पाऊस आल्यामुळे शेतकर्यांना फटका बसला आहे. अनेक भागात मळणी सुरू आहे.
पाऊस आल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू आहे. या द्राक्ष बागायदारांनाही या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.