राज्यात 29 महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला. या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचा महापौर बसणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे येथे या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता तिथेही महपौरपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. असे असतानाच आता एका महानगरपालिकेत मात्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी राजकीय चाल खेळली आहे. त्यांच्या या डावपेचामुळे भाजपा एकदम चितपट झाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या डावपेचामुळे आता या महापालिकेत थेट शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. भाजपासाठी हा चांगलाच धक्का असल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महापालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. येथे एकूण 78 जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपाला एकूण 37 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काहीही झाले तरी येथे भाजपाचाच महापौर बसेल, असे सांगितले जात होते. परंतु श्रीकांत शिंदे यांनी ऐनवेळी सूत्र हाती घेत मोठ्या घडामोडी घडवून आणल्या आहेत. उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या 38 वर गेली आहे. दुसरीकडे भाजपाचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा एक उमेदवार कमी म्हणजेच 37 वर आले आले आहे. सविता तोरणे यांचा शिवसेना प्रवेश हा उल्हासनगरमध्ये गेमचेंजर ठरला आहे. तोरणे यांच्या पक्षप्रवेशासह तिथे शिवसेना वंचितचे दोन्ही उमेदवार सोबतघेऊन सत्तेत बसणार आहे. तिथे शिवसेनेचाच महापौर होणार, असे सांगितले जात आहे.
नेमकं काय होणार?
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी ऐनवेळी सविता तोरणे यांना पक्षात घेतल्याने सगळेच गणित बदलले आहे. आकडेच बदलल्याने भाजपाचा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




