सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थत CBSE ने १० वीच्या बोर्ड परीक्षेबाबत एक नवा नियम लागू केला आहे. २०२६ पासून सीबीएसई १० च्या विद्यार्थ्यांना दोन बोर्ड परीक्षा घेणार आहे.यातील पहिली परीक्षा ही आता सक्तीची करण्यात आली आहे.
किमान तीन विषयांच्या पेपरला उपस्थिती
जे विद्यार्थी बोर्डाच्या पहिल्या परीक्षेतील किमान तीन विषयांच्या पेपरला उपस्थित राहणार नाहीत त्यांना रिपीटच्या श्रेणीत ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने सीबीएसईच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे.
ज्या विद्यार्थ्यांची पहिली बोर्ड परीक्षा चुकली आहे त्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाला दुसऱ्या परीक्षेला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत होती. त्यानंतर सीबीएसई बोर्डानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले भारद्वाज
सीबीएसई परीक्षा विभागाचे अधिकारी सन्यम भारद्वाज यांनी पीटीआयला सांगितलं की, ‘सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या बोर्ड परीक्षेत उपस्थित राहणं गरजेचं आहे. सर्व उत्तीर्ण आणि पात्र विद्यार्थ्यांना त्यांची विज्ञान, गणित, समाज शास्त्र आणि भाषा यातील कोणत्याही तीन विषयातील कामगिरी सुधारण्याची संधी मिळेल.
तर रिपीटरचा शिक्का बसणार
भारद्वाज म्हणाले की, जर विद्यार्थी पहिल्या बोर्ड परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयाच्या परीक्षेसाठी आलेच नाहीत तर त्यांना दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. त्यांना रिपीट श्रेणीमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना थेट पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील मुख्य परीक्षेलाच बसता येणार आहे.’





