Thursday, March 26, 2026
Homeमहाराष्ट्रउत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गारपिटीचं संकट, महाराष्ट्रावर 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गारपिटीचं संकट, महाराष्ट्रावर 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

फेब्रुवारी महिना कोरडा गेल्यानंतर मार्चमध्ये उन्हाचा कडाका वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, १५ मार्चपासून सुरू झालेला अवकाळी पावसाने धुमाकूळ सुरू केला तो काही अद्याप थांबलेला नाही.

 

स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्चपासून राज्यात पावसाचा आणखी एक नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

 

स्कायमेटच्या अंदाजानुसार, राज्यात सध्या पावसाची तूट असली तरी, जे काही पाऊस आणि गारपीट झाली आहे, तिचा फटका पिकांना बसला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला द्राक्ष मणी तडकणे किंवा कुजणे अशा समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ द्राक्षच नव्हे, तर गहू, हरभरा आणि भाजीपाल्याचेही या प्री-मान्सून पावसाने नुकसान केले आहे.

 

का बदलतंय वारंवार हवामान?

स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमध्य समुद्राकडून येणारे वेस्टर्न डिस्टरबन्स एकापाठोपाठ एक सक्रिय होत आहेत. येत्या २६ मार्चला एक सायक्लोनिक सर्क्यलेशन सिस्टीम उत्तर भारतात धडकणार असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. यातच राजस्थान आणि पाकिस्तानच्या सीमेवर तयार होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे अरबी समुद्रातून बाष्प ओढले जात आहे. यामुळे दुपारनंतर अचानक ढग दाटून येणे, विजांचा कडकडाट होणे आणि धुळीच्या वादळासह पाऊस पडणे अशा घटना घडत आहेत.

 

२६ ते ३० मार्च या जिल्ह्यांना बसणार फटका

२६ मार्चपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा नांदेड, धाराशिव, परभणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांवर पाहायला मिळू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही ढगाळ वातावरण राहील. ३० आणि ३१ मार्चच्या सुमारास पावसाची व्याप्ती वाढून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

उष्णतेपासून दिलासा

पावसामुळे किमान तापमानात घट झाल्याने उन्हाच्या चटक्यापासून आणि हीट वेव्हपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा दिलासा नसून मोठं संकट आहे. ज्या पिकांची कापणी सुरू आहे किंवा जे धान्य खळ्यावर पडले आहे, ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती हीच राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -