राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पाऊस झाला. एकीकडे उन्ह तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती होती. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आजही पाऊस काही जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे. एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. यवतमाळ, अमरावती आणि वर्धा येथे परिस्थिती गंभीर आहे. 47 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झाली. आजही भारतीय हवामान विभागाकडून विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात उष्णतेचा मोठा इशारा देण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. यासोबतच प्रशासनाकडून नागरिकांसाठी काही सूचनाही जारी करण्यात आल्यात. सध्या अकोला शहरात उष्णतेची तीव्र लाट पहायला मिळत असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
अकोल्याचे तापमान तब्बल 46.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून मागील काही वर्षांतील उच्चांक गाठला आहे. या प्रचंड उष्णतेचा प्रत्यय देणारी एक वेगळीच घटना समोर आली आहे. शहरातील काही ठिकाणी नागरिकांनी थेट गरम फरशीवर बेसनाचा पराठा भाजून दाखवला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नसून उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी दुपारी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढत असून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये देखील दुपारच्या वेळी वाढत्या उन्हामुळे रस्त्यावर जास्त गर्दी बघायला मिळत नाहीये. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. देशातील टॉप 5 सर्वाधिक उष्णता असलेल्या शहरांमध्ये अमरावती आणि अकोल्याचा समावेश झाला. राज्यात अगोदर पावसाने कहर केला आणि आता उष्णता वाढत आहे. यादरम्यान जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आव्हान प्रशासनाकडून नागरिकांना केले जात आहे. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून काल तापमानाने 44.6 अंश सेल्सिअसचा एप्रिलमधील उच्चांक गाठला, तर आजही तापमान 44 अंशांच्या वरच नोंदवले जात आहे.


