Sunday, May 10, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजीत यंत्रमाग बंद आंदोलनाला हिंसक वळण, आमदार राहुल आवाडेंच्या कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजीत यंत्रमाग बंद आंदोलनाला हिंसक वळण, आमदार राहुल आवाडेंच्या कार्यालयावर मोर्चा

खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसाठी सुरू झालेल्या यंत्रमाग बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात हिंसक वळण लागले. तारदाळ, खोतवाडी, कोरोची, गणेशनगर परिसरातील सुरू असलेल्या यंत्रमाग कारखान्यात राडा झाला.

 

यामध्ये सात ते आठ कारखान्यातील सुताची बिमे आंदोलकांनी कापली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

 

या आंदोनामुळे ग्रामीण भागातील ९० टक्के यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. मजुरीवाढीचा प्रश्न निकालात निघेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत एक – दोन दिवसांत मार्ग न निघाल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या मेळाव्यानंतर बेमुदत यंत्रमाग बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली. काल शुक्रवारी साप्ताहिक सुटीचा दिवस होता. त्यामुळे या आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मात्र, आज सकाळपासून आंदोलनाची धग ग्रामीण भागात वाढत राहिली. काही भागात यंत्रमाग कारखाने सुरू असल्याचे समजल्यानंतर मोठ्या संख्येने आंदोलन एकत्र येऊन कारखाने बंद करण्यास सुरुवात केली.

 

काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग निर्माण झाले. कोरोची येथे एका कारखान्यात मालकाने आंदोलकांशी वाद घातला. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी या कारखान्यातील यंत्रमागावरील सात बिमे कापली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. संबंधित यंत्रमाग कारखान्याच्या मालकाने थेट शहापूर पोलिस ठाणे गाठले.

 

याबाबत पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले यांना बोलावून घेतले. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने आंदोलक पोलिस ठाण्यात पोहोचले. यावेळी संयमाने आंदोलन करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक लोहार यांनी केले. चर्चेतून तूर्त या वादावर पडदा टाकण्यात आल्यानंतर तणाव निवळला; पण आंदोलकांनी यापुढेही आक्रमक भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट केले. दिवसभरात आंदोलकांनी ग्रामीण परिसरात फिरून कारखाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार तारदाळ, खोतवाडी, कोरोची, गणेशनगर परिसरातील बहुतांशी यंत्रमाग कारखाने आज बंद राहिले.

 

गेल्या १३ वर्षांपासून खर्चीवाले यंत्रमागधारकांची मजुरीवाढ न झाल्यामुळे ते आक्रमक होत आहेत. या आंदोलनात अद्याप लोकप्रतिनिधींनी थेट सहभाग घेतलेला नाही. पुढील दोन दिवसांत याबाबत ठोस हालचाली न झाल्यास आंदोलन अधिक हिंसक होण्याची भीती व्यक्त होत आहे. पॉवरलूम असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील हालचालीकडे आता लक्ष लागले आहे.

 

वहीफणी एजंटांची भूमिका बदलली

 

वहीफणीची दरवाढ नुकतीच जाहीर करण्यात आली होती. त्याला खर्चीवाले यंत्रमागधारकांनी आपेक्ष घेतला आहे. आपली मजुरी पहिला वाढवा मगच वहीफणी दरवाढ देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे गुरुवारच्या मेळाव्यात वहीफणी दरवाढीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आता वहीफणी एजंटांनी वाढीव दर देतील, त्यांच्याच यंत्रमाग कारखान्यातील वहीफणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या उद्योगात नवीनच गुंता निर्माण झाला आहे.

 

आंदोलकांची आमदारांच्या कार्यालयावर धडक

 

सायंकाळी आंदोलकांनी थेट आमदार राहुल आवाडे यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलकांनी आमदार आवाडे व प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. मजुरीवाढीबाबत ट्रेडिंगवाल्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, कारखाने बंद ठेवू नका, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले. त्यावर रविवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता मलाबादे भवन (चंदूर) मेळावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे आंदोलकांनी जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -